
गॅसअभावी पुन्हा चूल पेटली; मोठ्या कुटुंबांपुढे स्वयंपाकाचा गंभीर प्रश्न


हिमायतनगर | एकीकडे डिझेल टंचाईने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त असताना, आता घरगुती गॅस टंचाईनेही सामान्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, सिलेंडरसाठी तब्बल ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांतून व्यक्त होत आहे.


विशेषतः मोठ्या कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी लागणारा गॅस लवकर संपत असल्याने गृहिणींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील गॅस संपल्यानंतर नाईलाजाने पुन्हा पारंपरिक चूल पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.



शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भाग धुरमुक्त झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस वेळेवर मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी करायचे तरी काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


वाढत्या गैरसोयीमुळे महिलांमध्ये व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ग्रामीण भागातील गॅस पुरवठा करण्याची मुदत कमी करून 25 दिवसांनी गैस देण्यात यावा जेणे करून मोठं कुटुंबातील सदस्यांची होणारी परवड थांबेल. यासाठी तात्काळ सुरळीत गॅस करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
