
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी वातावरणामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, हळद, आंबा यासह फळबागां उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


तालुक्यातील पारवा खुर्द येथे दिनांक 8में रोजी दुपारी झालेल्या अवकाळी पावसा दरम्यान शिवाजी काशिनाथ सूर्यवंशी यांच्या घराचे संपूर्ण छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे घरातील साहित्याचेही नुकसान झाले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागा, वैरण तसेच हळद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक धोक्यात आले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


दरम्यान, विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


