
मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – मंत्री अतुल सावे


नांदेड| राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी 30 एप्रिल 2026 रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.


इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृह येथे 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.


या मेळाव्याचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.


मेळाव्यात विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्जातील त्रुटी टाळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्र, प्रशस्तीपत्र, मेडल तसेच ट्रॅक्टर, वाहने आदींचे वितरण करण्यात येणार आहे.
शेतकरी, लघुउद्योजक व बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, यासाठी तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार असल्याने या मेळाव्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
