बिलोलीत स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट तांदूळ
नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची कारवाईची मागणी
बिलोली| तालुक्यातील तसेच शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित होत असल्याच्या तक्रारींना उधाण आले असून, यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद बिलोलीच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मिळणारा तांदूळ तुटलेला, धुळकट असून काही ठिकाणी दगड-माती मिश्रित असल्याचे दिसून येते. तसेच काही वेळा तांदळाला दुर्गंधी येत असल्याने तो वापरण्यास अयोग्य ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने निकृष्ट धान्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती ...





