
हिमायतनगर (वाढोणा),उत्कर्ष मादसवार| यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडून पीकपाणी भरभरून यावे आणि शेतकरी तसेच सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करीत आषाढी एकादशीनिमित्त हिमायतनगर (वाढोणा) शहरातील शेकडो भाविकांनी विठ्ठल-रुख्माई व श्री परमेश्वराचे दर्शन घेतले.



श्रीक्षेत्राचा दर्जा प्राप्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकाळापासून आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, दि. २५ रोजी मंदिरातील विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वारकरी संप्रदायातील महिला-पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अनेक भक्तांकडून केळी व राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी ६ वाजता पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून विठ्ठल-रुख्माई अभिषेक सोहळा पार पडला. मंदिराचे संचालक संजय माने यांनी सपत्नीक अभिषेक केला.



सायंकाळी ५ वाजता परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळे तसेच वारकरी महिला-पुरुष भक्तांच्या सहभागातून नगरप्रदक्षिणा दिंडीला सुरुवात झाली. दिंडीपूर्वी मंदिराच्या सभागृहात महिला व पुरुष भजनी मंडळांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामस्मरण करीत नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. दिंडीत चिमुकल्यांनी विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. शहरातील तसेच बाहेरील विविध मंदिरांतील देवी-देवतांचे दर्शन घेत भाविकांनी जणू पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेतला. टाळ-मृदंगाचा निनाद, भजनी मंडळांचा गजर आणि विठूनामाच्या जयघोषामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते.



शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत श्री परमेश्वर मंदिर समितीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली नगरप्रदक्षिणा दिंडी पुन्हा मंदिरात परतल्यानंतर भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटपाने उत्साहात सांगता झाली. दिंडीत श्री परमेश्वर महिला व पुरुष भजनी मंडळांसह शेकडो महिला-पुरुष, बालगोपाल आणि वारकरी संप्रदायातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


आषाढी एकादशीनिमित्त हिमायतनगरात भक्तिमय वातावरण!
श्रीक्षेत्र हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल-रुख्माईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामस्मरण करीत शहरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. चिमुकल्यांनी विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा साकारत दिंडीत सहभाग घेतला. यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडून पीकपाणी भरभरून यावे आणि शेतकरी बांधवांसह सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
