आनंदी जीवनासाठी गुरुकृपेचे महत्व

प्रस्तावना – गुरू हे जीवनाला योग्य दिशा देणारे असतात. श्री दत्तगुरूंनी जसे २४ गुणगुरु केले, तसे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक प्रसंगातील गुण पाहण्याची दृष्टी गुरू देतात. परंतु आपण बहुधा स्वतःतील आणि इतरांतील गुणांकडे न पाहता स्वभावदोष व उणिवांकडेच लक्ष देतो. त्यामुळे जीवनातील आनंदाचे अनेक क्षण अनुभवण्यापासून वंचित राहतो. प्रत्यक्ष आनंदी जीवन जगण्यासाठी श्री दत्तगुरूंप्रमाणे प्रत्येकातील गुण पाहण्याची वृत्ती आवश्यक आहे. गुरुकृपायोगानुसार व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं कसे दूर होतात, तसेच आनंदमय जीवनाकडे वाटचाल कशी होते, यासंदर्भात माहिती सनातन संस्थेने संकलित केलेल्या या लेखातून पाहू.

गुरुकृपेचे महत्त्व – श्री गुरुचरित्र (१३:१३०) मध्ये म्हटले आहे, “गंगेमुळे पाप, शशीमुळे ताप आणि कल्पतरूमुळे दैन्य नाहीसे होते; परंतु श्रीगुरूंच्या दर्शनाने पाप, ताप आणि दैन्य या तिन्हींचे हरण होते.” गुरु जीवाला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरुकृपेमुळे साधकाच्या जीवनात अंतर्मुखता, सात्त्विकता आणि आत्मिक आनंद निर्माण होतो. ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसल्याने ईश्वराशी एकरूप होण्यासाठी स्वतःतील स्वभावदोष व अहं दूर करणे आवश्यक आहे. साधनेमुळे मन शुद्ध होऊन सूक्ष्मदृष्टी जागृत होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनतो. हे गुरुकृपेने साध्य होत.

अष्टांग साधना – नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्‌साठी त्याग, निरपेक्ष प्रेम, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भाववृद्धी हे गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेचे टप्पे आहेत. यामुळे आध्यात्मिक उन्नती होते.  “सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार होवो” हा भाव अष्टांग साधनेने साधकात निर्माण होतो.

आजच साधना सुरू करा – तरुणांनी वृद्धापकाळाची वाट न पाहता तरुण वयातच साधना आरंभ करावी; कारण मनुष्यजन्माचा खरा उद्देश ईश्वरप्राप्ती हा आहे. वृद्धापकाळात विविध व्याधीं सुरू झाल्याने तिकडेच लक्ष अधिक असत. त्यावेळी व्याधी सुसह्य होण्यासाठी साधना आवश्यक आहे. गुरुकृपेच्या बळावर साधक आनंदमय जीवन जगण्यास सक्षम होतो.

गुरुतत्त्वाच्या चरणी प्रार्थना – अशा प्रकारे गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेने साधकाला स्वभावदोष व अहं-निर्मूलनातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेऊन कलियुगातील अस्थिर जीवनात चिरंतन आनंद मिळतो. म्हणूनच गुरुकृपायोग हा केवळ साधनेचा मार्ग नसून आनंदमय आदर्श जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

आपल्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करून जीवनातील प्रत्येक क्षणाचा खरा आनंद अनुभवणे, हीच गुरुकृपा आहे. या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुतत्त्वाच्या चरणी आपण प्रार्थना करूया— “हे भगवंता, हे गुरुमाऊली, आम्हाला जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवता येऊ दे. त्यासाठी आमच्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करण्याची शक्ती, तळमळ आणि सातत्यपूर्ण साधना करण्याची प्रेरणा आम्हाला द्या.”

संदर्भ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

संकलक : श्री. दत्तात्रेय वाघूळदे, संपर्क क्रमांक : 9284027180

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!