हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये घबराट, मात्र कोणतीही जीवितहानी नाही

हिंगोली | हिंगोली जिल्ह्याला शनिवारी (११ जुलै) सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सकाळी ११:२६ वाजता भूगर्भातून आवाजासह धक्का जाणवल्याने नागरिक काही काळ घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाची ३.५ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदविण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू वसई (ता. औंढा नागनाथ) परिसरात असून तो भूगर्भात सुमारे ५ किलोमीटर खोलीवर असल्याचे भूकंप मापक केंद्राने नोंदविले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून प्रशासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वीही हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन केले आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अधिकृत माहिती आणि सूचना केवळ प्रशासनाच्या माध्यमातूनच स्वीकाराव्यात, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!