७०० वर्षांची परंपरा, विठ्ठलनामाचा गजर; संत साधू महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना!

चांदीच्या पालखीचे प्रथम दर्शन; टाळ-मृदंगाच्या गजरात कंधार नगरी भक्तिमय

कंधार,सचिन मोरे| “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी”च्या अखंड जयघोषात कंधार नगरी बुधवारी दुपारी अक्षरशः विठ्ठलमय झाली. मराठवाड्याच्या संत परंपरेचा अभिमान असलेल्या श्री संत साधू महाराज संस्थानच्या ७०० वर्षांच्या अखंड वारी परंपरेतील पायी दिंडीचे आज भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. हजारो वारकरी, महिला, युवक आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण कंधार नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

यंदाच्या दिंडीचे सर्वात मोठे आकर्षण ठरली ती प्रथमच सहभागी झालेली भव्य चांदीची पालखी आणि नवीन चांदीचा रथ. फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेल्या पालखीत विराजमान झालेल्या संत साधू महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पालखी मार्गक्रमण करत असताना टाळ-मृदंगाचा गजर, हरिपाठ, अभंग आणि विठ्ठलनामाने वातावरण भारावून गेले.

ह.भ.प. गुरुवर्य एकनाथ महाराज साधू कंधारकर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज साधू कंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या दिंडीला विविध सामाजिक, धार्मिक आणि वारकरी मंडळांनी पुष्पवृष्टी करून निरोप दिला. भगव्या पताका खांद्यावर घेऊन चालणारे वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन, ओठांवर विठ्ठलनाम आणि पायात भक्तीचा उत्साह असे दृश्य कंधार- करांसाठी अविस्मरणीय ठरले.

संत साधू महाराजांनी सुरू केलेल्या वारकरी परंपरेला पुढे वै. ह.भ.प. सीताराम (बाबू) महाराज कंधारकर आणि वै. ह.भ.प. शंकर महाराज कंधारकर यांनी संघटित दिंडीचे स्वरूप दिले. गेल्या सुमारे ७० वर्षांपासून ही पायी दिंडी अखंडपणे सुरू असून आज ती मराठवाड्याच्या वारकरी चळवळीचे श्रद्धास्थान बनली आहे.

मराठवाडयातील पहिल्या क्रमांकाची दिंडी म्हणून मानाची दिंडी समजली जाते. प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही संस्थानचे आठवे वंशज मठाधिपती श्री. ह. भ. प. एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली सकाळी बारा वाजता श्री. संत साधू महाराज संस्थांन पासून सर्व वंशज मठाधिपतीच्या व देवदेवतांच्या आरती करून मार्गस्थ झाली.

हि दिंडी कंधार, लोहा,माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरूर, चापोली, चाकुर, घरणी,भातखेडा, लातुर, साकरा, बोरगाव, मुरूड,ढवळाला, तडवळे, येडसी, घारी, जामगाव, बार्शी, म्हैसगाव, कुर्डूवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव, पंढरपूर अशी मार्गस्थ होणार आहे. कंधार ते पंढरपूर असा १४ दिवसांचा पायी प्रवास करत ही दिंडी २२ जुलै रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी पोहोचणार आहे. मार्गातील प्रत्येक गावात दिंडीचे स्वागत होणार असून, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि नामस्मरणातून संत परंपरेचा संदेश जनमानसात पोहोचविला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!