
हदगाव | पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टिकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हदगाव शाखेला दिल्या आहेत.



दि. 28 एप्रिल 2026 रोजी शाखा व्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रात खासदार आष्टिकर यांनी नमूद केले आहे की, बँकेचे काही कर्मचारी खेड्यापाड्यात जाऊन शेतकऱ्यांकडून कर्ज भरण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शासनामार्फत पीक कर्जमाफी जाहीर असताना अशा प्रकारे सक्ती करणे अन्यायकारक असून शेतकऱ्यांवर मानसिक व सामाजिक ताण निर्माण होत आहे.



सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना वारंवार त्रास देणे, दमदाटी करणे किंवा अपमानास्पद वागणूक देणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना तात्काळ आळा घालावा आणि बँक कर्मचाऱ्यांमार्फत कोणत्याही प्रकारची सक्ती थांबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


तसेच, शासनाच्या निर्णयांनुसार व प्रचलित नियमांप्रमाणेच पुढील कार्यवाही करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी उच्चस्तरीय यंत्रणेकडे तक्रार करण्याचा इशाराही खासदारांनी दिला आहे. या पत्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, बँक प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती पावले उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


