दोन-तीन वर्षांपासून गायगोठ्याचे अनुदान प्रलंबित; शहापूरचे शेतकरी आर्थिक संकटात

देगलूर /शहापूर,गंगाधर मठवाले | शासनाच्या गायगोठा योजनेअंतर्गत कामे पूर्ण करून दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटला असतानाही शहापूर येथील पाच शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने प्रलंबित गायगोठ्याचे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक, मजूर आणि गरजूंसाठी शासनाकडून विविध योजनांची घोषणा करून त्यांची माहिती दिली जाते. या योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी नागरिक आवश्यक ती कामे पूर्ण करतात. मात्र, अनेकदा काम सुरू करण्यापूर्वी शासनाकडून कोणतीही रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशातून अथवा उसनवारी करून कामे पूर्ण करावी लागतात.

याच पद्धतीने शहापूर येथील मुद्रिका भुमरेडी, भूपतवार यलरेडी भुमरेडी, चामावार प्रकाशरेडी हनमलू चितलवार, चंद्रकलाबाई चंदर इबितवार आणि गगामणी व्यंकट मामडे या पाच शेतकऱ्यांनी गायगोठ्याचे काम पूर्ण केले. जनावरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध होईल आणि शासनाचे अनुदान मिळेल, या अपेक्षेने त्यांनी आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता कामे पूर्ण केली. मात्र, काम पूर्ण होऊन दोन ते तीन वर्षे उलटूनही अनुदान मिळालेले नाही.

आधीच शेतीसमोरील अस्मानी-सुलतानी संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यात गायगोठ्याच्या कामासाठी केलेला खर्च आणि अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित अनुदानाची कार्यवाही पूर्ण करावी आणि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!