
महावितरणच्या कारभाराविरोधात धडक मोर्चाचा इशारा
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील वाढोना येथे महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लपंडावामुळे नियमित वीजबिले भरूनही ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.



विशेष म्हणजे परिसरात मोठा पाऊसही झालेला नसतानाही वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच शहरातील अस्वच्छता आणि साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे.



स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा विभागाच्या विरोधात नागरिकांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. वाढत्या उकाड्यात आणि डासांच्या प्रादुर्भावात वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी जोर धरत आहे.


