
कृषी व्यापाऱ्यांना किसान सेलचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या कडक सूचना
हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील सर्व कृषी व्यापाऱ्यांना बोगस बियाणे, खताचा साठा करून जास्त दराने विक्री तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार बाबुराव कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांच्या सूचनेनुसार किसान सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश जाधव (प्रकाश भिया जाधव) यांनी ही सूचना जारी केली आहे.


किसान सेना व शिंदे सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तालुक्यात बोगस बियाणे किंवा खताचा साठा करून जास्त दराने विक्री करणारे व्यापारी आढळल्यास संबंधितांवर शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून देण्यात आल्या असून, अशा गैरप्रकारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी अथवा व्यापाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदी करताना अधिकृत पावती घेणे, उत्पादनाची वैधता तपासणे आणि संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


