
छत्रपती संभाजीनगर| आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश G. Srikant यांनी दिले.


विभागीय आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील जिल्हानिहाय मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. शहरी आणि ग्रामीण भागातील नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.


पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष
नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढविणे, पूरस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतरासाठी सुरक्षित ठिकाणांची तयारी ठेवणे आणि बचाव पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पूरप्रवण गावांची अद्ययावत यादी तयार ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जुन्या व धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही सांगण्यात आले.


रस्ते, पूल आणि वीजयंत्रणांची दुरुस्ती
पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होणारे रस्ते आणि पूल यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. संवेदनशील ठिकाणी सूचना फलक, वाहतूक नियंत्रण आणि जलनिस्सारण यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला.वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ट्रान्सफॉर्मर, वीजवाहिन्या आणि विद्युत यंत्रणांची तपासणी करून विशेष दुरुस्ती पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या.


आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले.
२४x७ नियंत्रण कक्ष सुरू ठेवणार
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २४x७ नियंत्रण कक्ष आणि १०७७ टोल फ्री सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करून मॉक ड्रिल घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
‘दामिनी’ आणि ‘सचेत’ अॅपद्वारे जनजागृती
विज पडण्याच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी Damini आणि Sachet अॅपचा व्यापक प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला.
कृषी विभागामार्फत हवामान आधारित पीक नियोजन मार्गदर्शन आणि शेतकरी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच विजेपासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. मान्सून काळात सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास आपत्तीजन्य परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल आणि नागरिकांना वेळेवर मदत व सेवा उपलब्ध करून देता येतील, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.
