मांजरम येथील खंडगाव पांदण अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे आश्वासन

नायगाव| मांजरम येथील निजामकालीन खंडगाव पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी स्थळ पाहणीदरम्यान दिले.

राज्य शासनाच्या बळीराजा पांदण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते उपलब्ध करून देण्याचे काम राज्यभर सुरू असून, मांजरम येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडगाव पांदण रस्ताही याच योजनेतून विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले की, संबंधित पांदणाची लवकरच सरकारी मोजणी करण्यात येणार असून अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना शेतीसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून दिला जाईल.

यावेळी मंडल अधिकारी राठोड मॅडम, तलाठी अनुपवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी नेत्यांचा इशारा

यावेळी शेतकरी नेते पांडुरंग देवराव शिंदे यांनी सांगितले की, “निजामकालीन खंडगाव पांदण रस्ता पेरणीपूर्वी तात्काळ सुरू करावा. या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. जर पांदण रस्ता लवकर झाला नाही, तर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.”

यावेळी गणपत शिंदे, माधवराव शिंदे, गणेश शिंदे, प्रल्हाद मरेवाड, शंकर शिंदे, शरद शिंदे, मलदोडे सर, शिवा करणे, सतीश कोंडामंगल आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!