
नांदेड (प्रतिनिधी) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सतत दक्ष असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत केला तसेच हरवलेली हँडबॅग मालकिणीला परत केली.


“ऑपरेशन यात्री सुरक्षा” अंतर्गत २९ एप्रिल २०२६ रोजी समस्तीपूर (बिहार) येथील संतोष साहनी (वय ४०) यांनी देवगिरी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना त्यांचा सुमारे १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. ही घटना लासूर स्थानकावर गाडी थांबली असताना घडली.


तक्रारीची दखल घेत RPF नांदेड व छत्रपती संभाजीनगर तसेच सरकारी रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


दुसऱ्या घटनेत “ऑपरेशन अमानत” अंतर्गत जालना स्थानकावर सचखंड एक्सप्रेसमधील डबा क्रमांक B5 मध्ये एक हँडबॅग विसरल्याची माहिती ‘रेल मदत’ प्रणालीद्वारे मिळाली. RPF कर्मचाऱ्यांनी तात्काळ ती बॅग सुरक्षित ताब्यात घेऊन संबंधित प्रवाशाशी संपर्क साधला. योग्य पडताळणीनंतर रोख रक्कम, हेडफोन्स, चार्जर व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग मालकिणीला सुपूर्द करण्यात आली.



या दोन्ही घटनांमुळे RPF च्या सतर्कतेचा प्रत्यय आला असून रेल्वे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.
