
नांदेड| देशभर सुरू झालेल्या जनगणना-२०२७ प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी स्वतः स्व-गणना करत मोहिमेची सुरुवात केली. नागरिकांनी स्व-गणना करताना सेल्फी काढून या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवावा व इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.



भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना प्रक्रिया होणार आहे. नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरता येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.



जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.


