
नांदेड| भारताची जनगणना-2027 ही देशातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार असून, त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी 1 ते 15 मे दरम्यान जास्तीत जास्त स्व-गणना करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


जिल्हा नियोजन भवन येथे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी तसेच एनएसएस व एनसीसी समुपदेशकांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी डिजिटल जनगणनेच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत स्व-गणनेचे महत्त्व अधोरेखित केले.


स्व-गणनेसाठी नागरिकांना 1 ते 15 मे 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरता येणार आहे. नोंदवलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत स्व-गणनेत सहभागी व्हावे आणि नांदेड जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.


