हिमायतनगर तापतंय! 44°C वर पोहोचले तापमान; नागरिक हैराण, आरोग्याचा धोका वाढला

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात उष्णतेचा अक्षरशः कहर सुरू असून, सोमवारी दुपारी तापमानाने थेट 44 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सायंकाळी 5 वाजेपर्यंतही तापमान 41 अंशांवर स्थिर राहिल्याने उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

गरम वाऱ्याच्या झळा इतक्या तीव्र आहेत की, घरात बसूनही अंगावर उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते ओस पडलेले दिसत असून, अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

दरम्यान, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. दिवसाच्या कडक उन्हामुळे दुपारचे व्यवहार ठप्प होत असताना, संध्याकाळी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडताना दिसत आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शहरातील काही सामाजिक संस्था व व्यापाऱ्यांनी चौकाचौकात थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

आरोग्य तज्ज्ञांचा इशारा
उष्माघाताचा धोका वाढल्याने आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, डोक्यावर पांढरे कापड किंवा टोपी वापरावी, भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो सावलीत राहावे, असे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, उष्णतेच्या या लाटेमुळे पुढील काही दिवस परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!