
नवीन नांदेड| श्री गुरु गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी येथे आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा तणाव लक्षात घेऊन वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.


संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेक्टर डॉ. अंकुश सावरकर व वसतिगृह प्रशासनाच्या वतीने २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कृष्णा मेस रिक्रिएशन हॉल येथे तसेच रात्री ९.३० वाजता नंदगिरी बॉईज हॉस्टेलमध्ये मार्गदर्शन सत्र पार पडले. या कार्यक्रमात देवगिरी, नंदगिरी आणि गोदावरी वसतिगृहातील एकूण ६५० मुली व २१५ मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


या सत्रात विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताण-तणाव व्यवस्थापन आणि वसतिगृह स्वच्छतेचे महत्त्व या दोन प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. पुष्पा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी (जिल्हा परिषद, नांदेड) यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक मानसिक दृष्टिकोन राखण्याचे तसेच तणाव कमी करण्यासाठी प्रभावी तंत्रांची माहिती दिली. यासोबतच निरोगी जीवनशैलीसाठी वसतिगृह परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.


विद्यार्थ्यांनी या सत्राला उत्तम प्रतिसाद दिला असून संवादात्मक चर्चेद्वारे कार्यक्रमाचा समारोप झाला. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे व जबाबदार वसतिगृह जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अंकुश सावरकर, सौ. मनीषा कोकरे, डॉ. पौर्णिमा तलेले, डॉ. कल्पक सगर, डॉ. सौरभ जोगी व डॉ. भावना चौबीसा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.
