
हदगाव (प्रतिनिधी) नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSCB) च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक हदगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.


या बैठकीत निवघा, तळणी, हदगाव, ल्याहरी, आष्टी तसेच हिमायतनगर तालुक्यातील विविध फीडर संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वारंवार होणारी वीज खंडित होणे, जळालेल्या डीपी (ट्रान्सफॉर्मर), नवीन वीज खांब उभारणी तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत नागरिकांनी मांडलेल्या समस्या चर्चेत घेण्यात आल्या.



यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना देत सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीमुळे परिसरातील वीज समस्यांवर लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


