
विकासकामांच्या बहाण्याने राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न — स्थानिक राजकारणात खळबळ


हदगांव, गौतम वाठोरे| हदगावच्या स्थानिक राजकारणात सध्या ‘सत्तेपेक्षा सलोख्याच्या राजकारणा’ची एक नवी व्याख्या पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नगरसेवक अजय सूर्यवंशी यांनी थेट देश राजधानी गाठत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे हदगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात मोठ्या राजकीय फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. ही भेट विकासाचा अजेंडा की राजकीय लॉबिंग असा प्रश्न सर्व सामान्यात पडला आहे.


शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या नावाखाली ही भेट झाली असली, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ औपचारिक भेट नव्हती.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये बडे नेते आहेत त्यांनी नांदेड महानगरपालिकेवर पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलले आहे. चव्हाणांची जिल्ह्यात असलेली पकड आणि त्यांचा राजकीय करिष्मा पाहता, सूर्यवंशी यांनी घेतलेली ही भेट मतदारसंघातील सत्तासमीकरणांची नव्याने जुळवाजुळव असल्याचे मानले जात आहे.


पक्षभेद बाजूला ठेवत सूर्यवंशी यांनी थेट दिल्लीत ‘लॉबिंग’ केल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट केवळ विकासासाठी आहे की पुढील राजकीय प्रवासाची नांदी, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. अनुभवी नेतृत्वाचा नवा मार्ग अजय सूर्यवंशी यांना राजकीय कार्याचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी: माजी खासदार सुभाष वानखेडे यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले आहे.


तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचेही निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.एवढ्या दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या सूर्यवंशी यांनी आता थेट चव्हाणांच्या ‘दरबारी’ हजेरी लावल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या पुढील पाऊलाकडे लागले आहे.
पालिकेत सूर्यवंशी यांची समन्वयाची भूमिका
हदगाव पालिकेत निवडणुकीनंतर राजकीय अहंकार आणि गटबाजीमुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. अशा वेळी अजय सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय नगरसेवकांना एकत्र आणले. मतभेदांना बाजूला सारून त्यांनी समन्वयाचा धागा मजबूत केल्याने पालिकेच्या रखडलेल्या सभांचा मार्ग मोकळा झाला. ‘समन्वय हाच विकासाचा पाया’ हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले असून, त्यांच्या या परिपक्व नेतृत्वाची शहरात चर्चा होत आहे. थोडक्यात सांगायचे तर… “विकासासाठी सर्वांसोबत” हा संदेश देणारे अजय सूर्यवंशी यांचे हे दिल्ली दौरे हदगावच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार, हे निश्चित मानले जात आहे.
