
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील जुना कौठा, वसरणी, असर्जन, धुमाळवाडी, सिडको या भागात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या खंडिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा मनपा नगरसेवक डॉ. अभिषेक सौदे यांनी केली आहे.


सध्या उष्णतेची लाट सुरू असताना दिवसरात्र वीजेचा लपंडाव सुरू असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकदा वीज गेल्यानंतर ती लवकर येत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारास जुना कौठ्यातील बीपीएड कॉलेजसमोरील डीपीला भीषण आग लागून संपूर्ण डीपी व केबल जळून खाक झाली होती. त्यामुळे परिसरात अंधार पसरला होता. यावेळी डॉ. सौदे यांनी थेट ऊर्जा राज्यमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने यंत्रणा हलवून अवघ्या दोन तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.


डॉ. सौदे यांनी इशारा देताना सांगितले की, महावितरणने आपला कारभार तातडीने सुधारावा, अन्यथा माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे नांदेड महावितरणच्या गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात येईल. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.


