
सुविधा नसताना वसुलीचा आरोप


भोकर/हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 अ वरील भोकर–हिमायतनगर मार्गाची दुरुस्ती न करता तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड न करताच सोनारी फाटा येथे टोल नाका सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था दयनीय असूनही टोल आकारला जात आहे. काही ठिकाणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून फोनपेच्या माध्यमातून पैसे मागितले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ‘चेकिंग’च्या नावाखाली त्रास दिला जात असल्याची तक्रारही पुढे आली आहे.


स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. रस्ता दुरुस्त होईपर्यंत आणि प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत टोल वसुली थांबवावी, अशीही मागणी जोर धरत आहे.


दरम्यान, कोणत्याही सोयी-सुविधा नसताना सुरू असलेली ही वसुली थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी ही नागरिकांनी दिला आहे.
