
कंधार( सचिन मोरे) मानवी जीवनामध्ये आई- वडील म्हणजेच ईश्वराचे दुसरे रूप होय. अनादी काळापासून अनेक महापुरुषांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करत जिवंतपणी मोक्ष मिळवले. त्यांचाच आदर्श घेत या काळामध्ये देखील मानवांनी आईवडिलांची श्रद्धा पूर्वक सेवा करावी. त्यांची सेवा केली तर कुठल्याही देवांचे दर्शन घेण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. असे परखड मत ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर यांनी बारुळ येथील येथे केले.


कंधार पासून जवळच असलेल्या बारूळ येथे संत श्री नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ व गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, कलशारोहण व भागवत कथा महा यज्ञाचा समारोप ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. याप्रसंगी पुढे बोलताना महाराज म्हणाले की,चांगले ते पहा. नालायकांचे प्रदर्शन हे अलीकडे फारच वाढले असून खरे संत चमत्कार दाखवत नसून साक्षात्कार दाखवतात.गाय ही पवित्र असून प्रत्येकाने गाय पाळली पाहिजे. गोमातेला हिंदू धर्मामध्ये अत्यंत मानाचे स्थान असून तिची सेवा केली पाहिजे त्यासाठी शासनाने गाय पाळणाऱ्याला चाऱ्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी केली.



यावेळी ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर यांचा सन्मानचिन्ह व आहेर देऊन संत श्री नामदेव महाराज यांनी मठ संस्थान व गावकऱ्यांच्या वतीने सन्मान केला. माजी जिल्हा परिषद सदस्य ,भाजपा कंधार दक्षिणचे अध्यक्ष ॲड. विजय धोंडगे यांनी श्री संत नामदेव महाराज यांना पूर्ण आहेर देऊन गोशाळेसाठी १००० कडव्याच्या पेंड्या देण्याचे जाहीर केले.



यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आ. रोहिदास चव्हाण,माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर,माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. विजय पाटील धोंडगे, देवराव पांडागळे, खुशाल पाटील उमरदरीकर ,माजी सभापती शिवकुमार देशमुख ,माजी सभापती सतीश पाटील उमरेकर सह असंख्य भक्तगण उपस्थित होते.



यावेळी उपस्थित बायलेकींचा सत्कार पांडुरंगाची प्रतिमा ,खन व प्रसाद देऊन करण्यात आला. भक्तिमय वातावरणात महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताह, कलशारोहण व भागवत कथेचा समारोप झाला. यावेळी परिसरातील वरवंट, चौकी धर्मापुरी, तेलूर,नंदनवन, चिखली,सावळेश्वर, औराळ,कवठा काटकळंबा या पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
