नांदेड (प्रतिनिधी) राज्य शासनाने मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला असूनही नांदेड जिल्ह्यातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थिनींकडून शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट इशारा देत अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.


शासनाने दोन वर्षांपूर्वी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय अमलात आणला. या अंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची भरपाई शासनाकडून महाविद्यालयांना दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थिनींकडून शुल्क आकारणी सुरूच ठेवली असल्याची बाब उघडकीस आली आहे.


विशेष म्हणजे, काही महाविद्यालयांनी “शासनाकडून पैसे आल्यानंतर विद्यार्थिनींना परत करू” असे सांगून सलग दोन वर्षे रक्कम वसूल केली. परंतु शासनाची रक्कम मिळूनही संबंधित विद्यार्थिनींना अद्याप पैसे परत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पालक व विद्यार्थिनींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, शासनाकडून भरपाई मिळत असताना विद्यार्थिनींकडून शुल्क घेणे पूर्णपणे गैर आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच संबंधित महाविद्यालयांची नावे आमदारांनी कळवावीत, मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन कारवाई करेन, असेही त्यांनी सांगितले. याबाबत हिमायतनगर, धर्माबाद, देगलूर या भागातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, मोफत शिक्षण योजनेमुळे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. तरीसुद्धा काही संस्थांकडून होत असलेली आर्थिक वसुली ही शासनाच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारी असल्याचे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण प्रेमी नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणात तातडीने चौकशी करून विद्यार्थिनींना वसूल केलेली रक्कम परत मिळावी, तसेच दोषी महाविद्यालयांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.




