हिमायतनगर| शहरातील उमर चौक परिसरात बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या भीषण भांडणाने परिसरात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रीय महामार्गालगत घडलेल्या या घटनेत तलवार व चाकूचा वापर करून एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.


या रक्तरंजित हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


घटनेनंतर दोन्ही बाजूकडील व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल होऊन एकमेकांविरुद्ध तक्रारी देत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचेच हे गंभीर रूप असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

तर आमच्या माणसाला पैसे का..? मागतोस असे कारण समोर करून हि घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थी व्यक्तीवरही हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळाचा तपास करत असून, गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





