नांदेड| गोदावरी नदी खोऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत डियाजियो इंडिया आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय संतुलन साधण्यास मोठी मदत होणार आहे.


हा करार नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि डियाजियो इंडिया (नांदेड) चे मॅच्युरेशन अँड डिस्टिलेशन विभागाचे महाव्यवस्थापक प्रकाश वामनराव बोडाडे यांच्या उपस्थितीत पार पडला.


या भागीदारीअंतर्गत डियाजियो इंडिया कडून पाणी पुनर्भरण (Water Recharge) तसेच WASH (पाणी, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयी) यांसंबंधित विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालय जलस्रोतांची निवड, शासकीय योजनांशी समन्वय आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, “गोदावरी नदी चे पुनरुज्जीवन हे केवळ पर्यावरणीय नव्हे तर लोकांच्या उपजीविका आणि शेतीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमामुळे भूजल पातळी सुधारेल आणि शेतकऱ्यांना अधिक विश्वासार्ह सिंचन सुविधा उपलब्ध होतील. शासनाच्या विविध योजनांचा समन्वय आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरेल.”

दरम्यान, डियाजियो इंडिया चे कॉर्पोरेट रिलेशन्स डायरेक्टर देवाशीष दासगुप्ता यांनीही या उपक्रमाबाबत सकारात्मक भूमिका मांडत, पर्यावरण संवर्धनासाठी उद्योग आणि प्रशासन यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. या सामंजस्य करारामुळे नांदेड जिल्ह्यात जलसंपदा व्यवस्थापनाला नवी दिशा मिळणार असून, पर्यावरणपूरक विकासासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




