नांदेड/माहूर (प्रतिनिधी) दत्त शिखराच्या पवित्र गादीवर विराजमान असलेले महंत श्री मधुसूदन जी भारती (मालक) महाराज यांच्या निधनाने माहूरगडावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित राहून महाराजांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.


यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत “महाराजांचे जाणे अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. त्यांनी आयुष्यभर धर्मसंवर्धन, समाजसेवा आणि अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अखंड कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना जीवनाला दिशा मिळाली,” असे सांगितले.



भक्तपरिवाराला मोठा धक्का – महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने केवळ दत्त शिखर संस्थानचेच नव्हे तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आमदारांनी व उपस्थित भक्तांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली की दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो.


नव्या महंतांचेही घेतले दर्शन
दरम्यान, दत्त शिखर माहूरगडच्या महंतपदी निवड झालेल्या धनेश्वर भारती (श्याम बाबा भारती) यांचेही आमदार कोहळीकर यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देत, “आपल्या मार्गदर्शनाखाली दत्तसंप्रदायाची परंपरा अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला.


परंपरेचा दीप अधिक तेजस्वी होण्याची अपेक्षा
धनेश्वर भारती उर्फ श्याम बाबा भारती यांनी महंतपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची अपेक्षा भक्तांकडून व्यक्त होत आहे. माहूरगडावर सध्या भाविकांची मोठी गर्दी होत असून, दत्तसंप्रदायात शोक आणि नव्या आशेचा संगम पाहायला मिळत आहे.




