नांदेड| अवैध सावकारी व्यवसाय करून पैसे वसुलीसाठी नागरिकांना डांबून ठेवत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.


पोलीस ठाणे भाग्यनगर (गु.र.नं. 165/2026) व अर्धापूर (गु.र.नं. 171/2026) येथे भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.


दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी रात्रगस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार साठे चौक परिसरातील खालसा फायनान्स व गुरुकृपा ट्रेडर्स कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी कर्ज वसुलीसाठी पिरबुर्हाण (नांदेड) येथील एका व्यक्तीस जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून कार्यालयात नेले, मारहाण केली व डांबून ठेवले. तसेच अर्धापूर येथील आणखी एका व्यक्तीलाही अशाच प्रकारे मारहाण करून बेकायदेशीरपणे कैदेत ठेवून पैसे उकळले.

अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये मजहर खान नवीद खान (38), अभिजीत सूर्यवंशी (18), सुमित उथळे (22)
अभय भुजबळे (19), अनिकेत हिरापुरम (18) यांचा समावेश असून, या प्रकरणातील अन्य 4 आरोपी फरार झाले त्यांचा शोध सुरू आहे. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
अटक आरोपींना पुढील तपासासाठी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.




