
कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक संकटात सापडून एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास जबादार कोण??


हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या निष्क्रिय कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट बियाणे, वेळेवर न मिळणारे अहवाल, मार्गदर्शन शिबिरांचा अभाव आणि शासकीय योजनांतील कथित गैरव्यवहारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळं तालुका कृषी अधिकारी व कृषी दुकानदार यांनी मिलिभगत करून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारली गेली कि काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.


शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी व गुण नियंत्रण अधिकारी यांनी हिमायतनगर शहरातील काही कृषी दुकानातून खते व बियाण्यांचे नमुने (सॅम्पल) तपासणीसाठी घेतले असले तरी अद्याप त्यांचा अहवाल जाहीर झालेला नाही. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी संबंधित बियाण्यांची पेरणी केली असून, अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. पेरणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल आल्यास त्याचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होणार नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


शेतकऱ्यांचा आरोप आहे की, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी मुख्यालयात न राहता अप-डाऊन करत असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरही शेतकऱ्यांसाठी प्रभावी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. परिणामी, अनेक अशिक्षित व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस होण्यापूर्वीच पेरणी केल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.


याशिवाय, काही बियाणे व खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचेही आरोप होत आहेत. त्यामुळे मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ध नग्न आंदोलने झाले होते. तसेच शासकीय कृषी योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांऐवजी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिला जात असल्याचा आरोपही केला गेला आहे. तसेच मार्गदर्शन शिबिरांच्या नावाखाली मोजक्या शेतकऱ्यांना बोलावून केवळ छायाचित्रे काढून शासनाकडे अहवाल पाठविण्याचा प्रकार होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
शेतकरी संघटनांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांनी या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात कृषी विभागाच्या विरोधात आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही दिला आहे. तसेच, कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक संकटात सापडून एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
या आरोपांबाबत संबंधित कृषी विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी सिड्डाम यांनी सांगितले की, दोन चार दिवसात मार्गदर्शन शिबिर हिमायतनगर शहरात घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच अनेक ठिकाणी आमचे कृषी सहायक मार्गदर्शन करत आहेत असे सांगून कृषी दुकानातून घेतलेल्या सॅम्पल बाबतचा अहवाल आला नसल्याचे सांगितांना बियाणे नसल्याबाबतच्या तक्रारीबाबत उडावा ऊडवीची उत्तर दिली.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वामनराव पाटील वडगांवकर यांनी सांगितलं कि, यापूर्वी कृषी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले होते. मात्र, अद्यापही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अन्यथा आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी हितासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
