
नांदेड| राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजने अंतर्गत e-KYC प्रक्रियेतून वंचित राहिलेल्या महिलांसाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भास्कर अण्णा (भास्कर तुम्मा) यांनी केली आहे.


या संदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, लाडकी बहीण योजना राज्यात प्रभावीपणे राबवली जात असून अनेक गरजू महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. मात्र, e-KYC प्रक्रियेसाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत अनेक महिलांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडलेले नसल्यामुळे त्यांचे e-KYC पूर्ण होऊ शकले नाही.


परिणामी, अशा पात्र महिलांना गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळालेला नाही. सध्या शासनाने 30 एप्रिल 2026 पर्यंत e-KYC दुरुस्तीची मुदत दिली असली, तरी ती केवळ आधी e-KYC केलेल्या महिलांसाठीच मर्यादित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.


प्रत्यक्षात अनेक पात्र लाभार्थी महिलांचे e-KYC झालेलेच नसल्याने त्या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाने अशा महिलांसाठी विशेष शिबिरे किंवा मोहिम राबवून त्यांचे e-KYC पूर्ण करावे, तसेच प्रलंबित असलेली 4 ते 5 महिन्यांची आर्थिक मदत त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला व बाल विकास मंत्री यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


