हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरातील टेंभी रोड परिसरातील अबुबकर देवस्थानाच्या जागेत नगरपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी, नगर पंचायत हिमायतनगर यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.



निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील कचरा ट्रॅक्टरद्वारे टेंभी रोडवरील माळरान भागात, अबुबकर देवस्थानाच्या जागेत टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचून दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना नाकाला रुमाल बांधावा लागत असून, जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे धूर व धूळ निर्माण होत आहे. या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.



विशेष म्हणजे, येत्या १० एप्रिल रोजी अबुबकर या ठिकाणी संदल कार्यक्रम आयोजित आहे. तसेच या परिसराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असून, येथे माहूरकडे जाणारा पुरातन भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. परिसरात मसाई देवीचेही स्थान असून, हिंदू-मुस्लिम समाजाचे हे एकत्रित श्रद्धास्थान आहे. अशा ठिकाणी कचरा टाकल्याने भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.


त्यामुळे नगरपंचायतीने तात्काळ या ठिकाणी टाकलेला कचरा हटवून पुढे येथे कचरा टाकू नये, तसेच पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संजू बासेवाड, दत्ता बासेवाड, दत्ता तुंगेवाड, रामजी डवरे, दत्ता अशोक बासेवाड, परमेश्वर आडेलू, पिराजी आडेलू, अशोक आडेलू, विठ्ठल तुंगेवाड, श्रीकांत दिगंबर तुंगेवाड यांच्यासह अनेक शेतकरी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





