महाराजस्व शिबिरातून जनतेच्या अडीअडचणींचा निपटारा – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
लोहा| महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांमुळे नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा जागीच निपटारा होत असून अशा शिबिरांचा नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
तालुक्यातील कापशी (बु.) येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) हे शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार-दोनूर अनन्या रेड्डी आणि तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांच्या अडीअडचणींचे तात्काळ निराकरण होत असल्याने वेळ व श्रम वाचतात...

