जनगणना अचूकतेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – राहुल कर्डीले

नांदेडमध्ये फील्ड ट्रेनर्स प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ
नांदेड| आगामी जनगणना प्रक्रियेसाठी नांदेड जिल्ह्यात फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नागरिकांनी अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारताची ही १६ वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. विशेष म्हणजे ही जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून त्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. यामध्ये नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वगणनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जनगणना ही संविधानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून देशाच्या विकास आराखड्याचा पाया आहे. यामधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध योजना, धोरणे आणि पायाभूत सुविधा यांचे नियोजन करत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मे आणि जून २०२६ या कालावधीत प्रगणक घराघरांत भेट देणार असून नागरिकांनी त्यांना योग्य व अचूक माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, महापालिकेचे उपायुक्त अभिजित वायकोस, सहाय्यक आयुक्त मनीषा नरसाळे तसेच जनगणना संपर्क अधिकारी नेहाल धुरंधरे उपस्थित होते. या प्रशिक्षणात संजय सोळंकर, गिरीश सर्कलवाड आणि संघरत्न सोनसळे हे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top