हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून काही जण कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे शहरातील धोकादायक ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी ठाम मागणी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी ALMbharat च्या माध्यमातून केली आहे.


हिमायतनगर शहरातीळ विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाणारा कॉर्नर, श्री परमेश्वर मंदिर कमान रस्ता, शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) परिसर, उमर चौक कमान तसेच बोरगडी रस्ता या शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि अपघातप्रवण ठिकाणी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.


यासंदर्भात संबंधित विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पठाण यांनी केला. “वेळेत उपाययोजना न केल्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळायची असेल तर तातडीने स्पीड ब्रेकर बसवणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. याकडे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी देखील लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांना सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडूनही त्वरित उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली असून, आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




