हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात सध्या काही टवाळखोर तरुणांकडून बुलेट व इतर दुचाकींना अवैध बदल करून कर्णकर्कश आवाज निर्माण केला जात आहे. विशेषतः ‘फटाका बुलेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंधळामुळे शांततेचा भंग होत आहे.


शहरातील मुख्य रस्ते, चौक तसेच निवासी भागांमध्ये मुद्दाम मोठा आवाज करत फेऱ्या मारल्या जात आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा हे वाहनचालक वेगमर्यादा मोडून स्टंटबाजी करत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे.


नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. “पोलीस प्रशासनाने अशा वाहनांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, सायलेंसरमध्ये केलेले बदल जप्त करावेत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

दरम्यान, हिमायतनगर पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष मोहीम राबवावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. कायद्याचा धाक राहावा यासाठी अशा प्रकारांवर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा टवाळखोरांचा हा त्रास वाढतच जाणार आहे.





