हिमायतनगर| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीने आता आंदोलनाचे रूप अधिकच तीव्र झाले आहे. नगरपंचायत समोरील आमरण उपोषण पाचव्या दिवशी सुरूच असून, रविवारी बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आल्याने वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


उपोषणकर्ते माधव शिंदे यांच्या आंदोलनाला आता प्रहार जनशक्ती संघटनेचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. संघटनेचे विधानसभा अध्यक्ष दत्ता देशमुख यांनी आंदोलनात थेट सहभाग घेत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निर्णयात विलंब होत असल्याने दिनांक 05 एप्रिल रोज रविवारी संपूर्ण हिमायतनगर ‘बंद’ ठेवण्याची हाक देण्यात आली असून, याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत आहे.


दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी सुचविलेल्या पाचही जागांपैकी एकही जागा उपलब्ध करून देता येत नसल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. जनभावनांचा अवमान झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

“जागा मिळेपर्यंत माघार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करत माधव शिंदे यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रहार संघटनेनेही ‘आरपारची लढाई’ छेडण्याचा निर्धार जाहीर करत शहर बंदची घोषणा केली आहे.

यासोबतच शहरातील मोक्याच्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांची चौकशी करून सार्वजनिक जागा तात्काळ मोकळी करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिस्थिती अधिक चिघळण्याआधी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक हिमायतनगर , जिल्हाधिकारी, तहसीलदार हिमायतनगर आणि नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देत त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यां निवेदनावर बालाजी ढोणे, वामनराव पाटील वडगांवकर, महेश गायकवाड, शिवाजी शिंदे, गोविंद शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, विष्णू वानखेडे, प्रकाश अवधूत, लक्ष्मण बक्केवाड, निळकंठ पवार, श्याम हेंद्रे, वैभव शिंदे, बालाजी मोरे, पोषट्टी जाधव, ऋषिकेश मंदेवाड आदिसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




