नांदेड (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले.


यावेळी बोलताना कुलगुरूंनी सांगितले की, फुले-आंबेडकरांचे विचार केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. “हे विचार समाजातील बांधिलकीची जाणीव करून देतात आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देतात. मात्र त्यांचा प्रभाव दिसण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या दृष्टिकोनात बदल घडवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, प्रमुख वक्ते डॉ. नारायण कांबळे, डॉ. रवी सरोदे, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. राजेंद्र गोणारकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते डॉ. नारायण कांबळे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका समाजाच्या नेत्याच्या चौकटीत पाहणे ही खेदजनक बाब आहे. त्यांनी राष्ट्र उभारणीत दिलेले योगदान अत्यंत व्यापक असून ते एक समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होते. त्यांच्या विचारांचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाजात समतेच्या मूल्यांची चर्चा होत असली तरी जातीयतेचे वास्तव पूर्णपणे नाहीसे झालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा उदगीरकर यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.




