वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

नांदेड | नांदेड शहरात गेल्या 72 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत वाढत्या गुन्हेगारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरात अल्पावधीत इतक्या गंभीर घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी, अगदी शासकीय रुग्णालय परिसरातही हत्यांसारख्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सदर प्रकरणातील सर्व हत्याकांडांची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय आश्रय मिळणार नाही, याची खात्री प्रशासनाने करावी, असेही ते म्हणाले.

याशिवाय, पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले. नांदेड मधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या प्रतिक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top