नांदेड|महाराष्ट्र विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या नांदेड जिल्हा पाहणी दौऱ्यात जिथे अनियमितता किंवा भ्रष्टाचार आढळला असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.


अंदाज समितीच्या दौऱ्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. यावर खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, समितीने त्यांचा अहवाल नियमानुसार विधीमंडळाला सादर करून अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित करावी, कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला किंवा गैरव्यवहाराला पाठीशी घालता कामा नये, हीच माझी भूमिका आहे.


उलटपक्षी अंदाज समितीला आढळलेल्या गैरव्यवहारांची माहिती सार्वजनिक करणे शक्य असेल तर आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर चौकशीसाठी पाठपुरावा करू. अंदाज समितीला आढळलेल्या प्रत्येक गैरव्यवहाराची सत्यता समोर आली पाहिजे, भ्रष्टाचाराचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. अनियमितता व भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.





