अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

नांदेड| अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या अर्धापूरमधील १०२ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत रोजगार हमी योजना विभागाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.


अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या किंवा बुजल्या होत्या. शासनाच्या विशेष मदत पॅकेजअंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज व पंचनामे पूर्ण केले होते. मात्र ‘मनरेगा’ योजना ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते.


या अन्यायकारक परिस्थितीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. “नुकसान समान असताना केवळ प्रशासकीय निकषांमुळे मदत नाकारणे योग्य नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आदेश देत रोहयो विभागाला योग्य मार्ग काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अर्धापूरमधील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या सिंचन व्यवस्थेच्या पुनर्बांधणीला गती मिळणार आहे.



