हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील उमरचौक परिसरात पैशांच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकीर हुसेन (वय 38, रा. उमरचौक, हिमायतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 8 एप्रिल 2026 बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उमरचौक कमानजवळ ही घटना घडली. उसने दिलेल्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला “तु हमारे आदमी को पैसे मांगता क्या?” अशी धमकी देत शिवीगाळ केली.


यानंतर आरोपींनी एकत्र येत चाकू व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी फिर्यादीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावावर व काकावरही जीवघेणे वार करण्यात आले, ज्यामुळे तेही जखमी झाले आहेत.


या प्रकरणी शेख ईलीयास, शेख एजाज, शेख जावेद, शेख फेरोज, शेख अफरोज, शेख इम्रान उर्फ ईमु व शेख महेमुद उर्फ तहारी (सर्व रा. हिमायतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हाके, पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून, घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हाके यांच्या उपस्थितीत घटनेच्या तपास सुरु करण्यात आला आहे. नांदेडमध्ये मागील तीन दिवसांपूर्वी 70 तासात पाच जणांचे खून झाल्याचे घटनेने खळबळ माजलेला असताना हिमायतनगर शहरात भर दिवसा तलवारी व चाकूने प्राण घातक हल्ला केल्याच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे पहावयास मिळाले आहे. शहरांत पोलिसांची वचक राहिली नसल्याचे यां घटनावरून दिसून येत आहे.




