हदगाव तालुक्यातील सर्व पांदण रस्ते खुले करा – प्रल्हाद पाटील हडसनीकर

हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणग्रस्त पांदण (शेत) रस्ते तात्काळ खुले करण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.


गेल्या काही वर्षांत तालुक्यातील अनेक शासकीय पांदण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मार्गच उरलेला नाही. परिणामी शेतीकामासाठी आवश्यक अवजारे, यंत्रसामग्री ने-आण करणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर रस्ते बंद झाल्याने शेती पडीत राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याचबरोबर रस्त्यांच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये तणाव आणि भांडणे वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


दरम्यान, शासनाने पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, रस्त्याचे नुकसान करणाऱ्या किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. अशा व्यक्तींचे आधार कार्ड व फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ते विविध शासकीय योजनांपासून वंचित राहू शकतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सूचनेनुसार ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर हदगाव तालुक्यातील सर्व अतिक्रमित पांदण रस्ते तात्काळ मोकळे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी केली आहे.

