धर्म अध्यात्म

श्रीक्षेत्र गंगणबीड येथे पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रा उत्साहात

नायगाव| तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र गंगणबीड येथे आंबली-बारसी निमित्त पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २९ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आली.

प्राचीन व जाज्वल्य परंपरा लाभलेल्या श्रीक्षेत्र गंगणबीड देवस्थानावर शिखर शिंगणापूरनंतर भाविकांची मोठी श्रद्धा असून दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते.

कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
रविवार दि. २९ मार्च : सायंकाळी ५ वाजता देवस्थानचे मुख्य पुजारी भागवत अप्पा स्वामी यांच्या निवासस्थानी शिव-पार्वतीची विधिवत महाभिषेक व आरती होईल. त्यानंतर बँड-बाजा, हलगी-सनई व भजनी मंडळींच्या गजरात पालखी गावातील मुख्य मार्गाने सायंकाळी ८ वाजता हनुमान मंदिरात पोहोचेल.

तेथेही महाभिषेक-आरती पार पडेल. रात्री ९ वाजता पालखी श्री महादेव मंदिरात आगमन करून महारुद्राभिषेकानंतर रात्री ९.३० वाजता शिव-पार्वतीचा शुभविवाह संपन्न होईल. यानंतर आरती व आकर्षक फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.

सोमवार दि. ३० मार्च : सकाळी ८ वाजता द्वादशी-बारसी निमित्त गावकऱ्यांतर्फे चैत्र-आंबलीचा भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. दिवसभर परिसरातील भाविक काठी-कावडी घेऊन दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

मंगळवार दि. ३१ मार्च : सकाळी ९ वाजता मंदिरात शिव-पार्वती पूजनानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी गावाकडे प्रस्थान करेल. हनुमान मंदिर मार्गे मुख्य पुजारी अप्पा स्वामी यांच्या निवासस्थानी आरती व पूजेनंतर महोत्सवाची सांगता होईल.

या भव्य धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्रीक्षेत्र गंगणबीड ग्रामस्थ मंडळी व मंदिर देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!