लोहा| सामाजिक परिवर्तन केवळ विचारांपुरते न राहता कृतीत उतरवण्याचा प्रेरणादायी आदर्श लोहा तालुक्यातील भारसावडा गावाने घालून दिला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मांडलेल्या स्त्री-पुरुष समतेच्या विचारांना साजेसा निर्णय घेत धनुरे कुटुंबाने समाजासमोर नवा संदेश ठेवला आहे.


भारसावडा (ता. लोहा) येथील संतोष सुभाष धनुरे (वय २४) यांचा सहा महिन्यांपूर्वी शीतल यांच्याशी विवाह झाला होता. संसार आनंदात सुरू असतानाच २१ मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील राहटी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात संतोष यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच शीतल या तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याने परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली.


या पार्श्वभूमीवर गावचे माजी सरपंच पप्पू पाटील हालगे यांनी पुढाकार घेत शीतल आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्यांनी संतोष यांचा धाकटा भाऊ राजेश्वर याच्यासमोर शीतलसोबत पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवला. सुरुवातीला काही शंका-कुशंका निर्माण झाल्या; मात्र गावातील तरुण आणि मान्यवरांनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करत सकारात्मक वातावरण निर्माण केले.

दोन्ही कुटुंबांनी भविष्याचा विचार करून या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार रविवारी (५ एप्रिल) राजेश्वर आणि शीतल यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. भावूक वातावरणात झालेल्या या विवाहाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण त्याच वेळी नव्या आयुष्याची आशाही निर्माण झाली.

राजेश्वरने आपल्या वहिनीचा हात धरत तिच्या पोटातील बाळाला वडिलांचे नाव आणि प्रेम देण्याची जबाबदारी स्वीकारली. या विवाहाचा संपूर्ण खर्च पप्पू पाटील हालगे यांनी उचलला, तसेच गावासाठी अन्नदानाचीही व्यवस्था केली. या निर्णयात सरपंच नवनाथ हालगे, माजी सरपंच मारोतराव एडके, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव हालगे आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. भारसावडा गावाने दाखवलेली ही संवेदनशीलता आणि धाडसी सामाजिक भूमिका तरुण वयात वैधव्याचे ओझे वाहणाऱ्या महिलांसाठी नवी दिशा देणारी ठरली आहे.




