नांदेड| दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाविरोधात नांदेडमध्ये दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत. सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.


मोर्चादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत “आम्हाला गुंडगिरी नको, मुंढेंसारखा प्रामाणिक अधिकारी हवा” अशी भूमिका मांडली. कडक उन्हाची पर्वा न करता मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव हातात फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.


यावेळी नांदेड दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीलाही आंदोलकांनी घेराव घालत आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.


निवेदनात मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करावी, संजय गांधी निराधार योजनेतील थकीत मानधन तत्काळ जमा करावे, आमदार-खासदार निधीचा योग्य विनियोग करावा तसेच दिव्यांगांसाठी राखीव १ टक्का निधी खर्च करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.


दिव्यांग बांधवांनी सांगितले की, मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती. बोगस दिव्यांग लाभार्थी आणि शाळांवर कारवाई करत पारदर्शकता आणण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशनचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी केले. दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.




