हरदडा येथे उद्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद
उपस्थित राहण्याचे प्रणिताताई कांबळे यांचे आवाहन
हदगाव, गौतम वाठोरे| हदगांव तालुक्यातील मौजे हरदडा येथे उद्या (दि. ३० मार्च) अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य आयोजिका प्रणिताताई कांबळे यांनी केले आहे.


प्रणिताताई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित या परिषदेचा उद्देश बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी विचारांचे प्रबोधन हा आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील ध्वजारोहणाने होणार असून, उपासिका सुजाताबाई अशोक दवणे, शांताबाई शंकर कांबळे व छायाबाई विजयराव कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे.


यानंतर सकाळी ९ वाजता दुसऱ्या सत्रास प्रारंभ होईल. या सत्रात भिक्खू संघाची धम्मदेशना भदंत पय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, आंबेडकरवादी मिशन, नांदेडचे संचालक दीपक कदम यांचेही मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत बनसोडे असतील, तर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य मोहन मोरे जबाबदारी सांभाळणार आहेत.

सायंकाळी व रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव समारंभ पार पडणार असून, लक्ष्मणराव वाठोरे, जयकीन रावळे, अमोल कदम, हरिदास कदम व शेख रहीम यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून साहेबराव कांबळे, सौ. सुमित्राबाई संदीपपान खरे व डॉ. अयुबखा आयुब पठाण मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके व गौतम कांबळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या शेवटच्या सत्रात बुद्ध-भीम गीतांचा वैचारिक सामना रंगणार असून, सुप्रसिद्ध गायक विकास राजा (नागपूर) व निशा धोंगडे (चंद्रपूर) यांच्या संचामध्ये हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

