नांदेड| नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या थेट घरांशी आणि जमिनींशी निगडित असलेल्या तीन महत्त्वाच्या विषयांसंदर्भात माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना पत्र लिहिले असून, ही कामे निश्चित कालमर्यादेत वेगाने पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे.


खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, इनाम जमिनी नियमित करून घेण्याबद्दल राज्य शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नांदेड शहरातील विषय तातडीने मार्गी लावण्यात यावेत, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी नियमाकूल करण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पुढील कार्यवाही सुरु करावी, तसेच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नांदेड शहरातील ‘सिडको’च्या घरांच्या हस्तांतरणांच्या अनुषंगाने ही घरे संबंधित नागरिकांच्या नावे करण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया सुरु करून त्याबाबत राज्य शासनाला पुढील प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा.


त्याचप्रमाणे तिन्ही विषय तातडीने आणि सुसूत्रतेने मार्गी लागावेत यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याची सूचना खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचा महसूल अधिकारी, मनपा उपायुक्त (मनपा हद्दीसाठी) आणि सिडकोच्या कामासाठी वरिष्ठ सिडको अधिकारी यांचा समावेश असावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या पुढाकारामुळे नांदेडमधील हजारो नागरिकांच्या घरांचा आणि हक्काच्या जमिनींचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.





